ब्रेकिंग न्यूज: इतिहास पेटला! शकुंतला रेल्वेच्या लोकोशेड व स्टेशन परिसरात भीषण आग — गोरगरिबांच्या आशेच्या धुरामध्ये उडाल्या आठवणी!
मुर्तीजापुर (जि. अकोला) –
आज ७ फेब्रुवारी, दुपारी एक वाजता, अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर रेल्वे जंक्शनवरील शकुंतला रेल्वे स्टेशन परिसरात आणि लोकोशेडमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या ऐतिहासिक आणि गोरगरिबांची लेकुरवाळी समजल्या जाणाऱ्या शकुंतला रेल्वेने आज पुन्हा एकदा आगीत होरपळून दुर्दैवाच्या छायेखाली आपली हाक दिली.
आग एवढ्या वेगाने पसरली की काही क्षणांतच आकाशात काळ्या धुराचे लोट उसळले. परिसरात अफवा पसरल्या, लोकांनी घरातून बाहेर धाव घेतली, भीतीने वातावरण भारावून गेले. जळणाऱ्या स्टेशन परिसराने आणि लोकोशेडने जणू काळच थांबवला होता!अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं, पण उरुळलेल्या रस्त्यांमुळे आणि खड्ड्यांनी भरलेल्या मार्गांमुळे त्यांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्या. या विलंबामुळे आग आणखीनच भडकली आणि शतकभर जुना इतिहास, आठवणी, वारसा – सगळं काही या आगीत धुरात मिसळून गेलं.रेल्वेचे कर्मचारी जीवाची बाजी लावून आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहिले. त्यांच्या धाडसामुळे एक मोठा अनर्थ टळला, अन्यथा संपूर्ण स्टेशन राखरांगोळी होण्याची शक्यता होती.
हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. २३ जानेवारी २०१९ रोजीही अशाच प्रकारे शकुंतला रेल्वेच्या बोगीला आग लागून ती पूर्णतः जळून खाक झाली होती.
मग प्रश्न उभा राहतो — इतक्या ऐतिहासिक रेल्वे स्थानकावर सुरक्षा उपाययोजना का नाहीत? अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकतील, अशी साधी सोय का नाही?एकीकडे सामान्य नागरिक शकुंतला रेल्वे पुन्हा रुळावर यावी म्हणून आंदोलने, निवेदने, निदर्शने करत आहेत, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची उदासीनता ही ऐतिहासिक रुळं गिळायला निघाली आहे.
आजही मुर्तीजापुर, अचलपूर, कारंजा, दर्यापूर आणि यवतमाळसारख्या भागातील नागरिक शकुंतला रेल्वे सुरू होण्याची वाट पाहत आहेत — पण प्रत्येक वेळी त्यांच्या आशा धुरामध्ये विरतात.शकुंतला ही फक्त एक रेल्वे नव्हे, ती एक भावना आहे – गोरगरिबांच्या प्रवासाची, इतिहासाची आणि आपल्या संस्कृतीची.पण आज त्या भावनेलाच आग लागली — आणि अजूनही कोणी जबाबदार नाही!
0 टिप्पण्या