ग्रामपंचायत प्रभाग रचना कार्यक्रम प्रसिद्ध
अकोला- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या, तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने दि.27 जानेवारी 2022 रोजीच्या प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याच्या कार्यक्रमातील सुनावणीच्या टप्प्यापासून प्रभागाच्या सीमा निश्चित करण्यासाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार प्रभाग रचना कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी व पातुर या तालुक्यातील एकूण 274 ग्रामपंचायतीच्या अंतिम प्रभाग रचनेला संबधित ठिकाणच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध देण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रा.पं./ जि.प./ पं.स. निवडणुक विभाग संजय खडसे यांनी कळविले आहे.
डाकविभागात कॅशलेस व्यवहार
अकोला - डाक विभागातील जिल्हा व तालुका पातळीवरील 46 कार्यालयामध्ये क्यु. आर. कोड उपलब्ध करण्यात आले आहे. या सुविधेमुळे डाक विभागातील सर्व व्यवहार कॅशलेस होणार होणार असून या सुविधेचा लाभ ग्राहाकांनी घ्यावा, असे आवाहन डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक यांनी केले आहे.
डाक कार्यालयातील उपलब्ध असलेल्या विविध सेवा जसे रजिस्टर पत्र, स्पीडपोस्ट, पार्सल बुकिंग व आर.डी. भरणा इत्यादी सेवा क्यु. आर. कोडचा वापर करुन कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे. याशिवाय डाकविभागातर्फे ग्राहकांकरिता इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याव्दारे ग्राहकांना एन.ई.एफ.टी., ऑनलाईन बील पेमेंट सुविधांचा लाभ घेता येणार आहे. तसेच पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावरुन एन.ई.एफ.टी व्दारे कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे पाठविता किंवा जमा करता येणार आहे. सद्या देशातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसमधील एसबी, आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ, एसएसए, एनएससी, केव्हीपी व एससीएसएस योजनांमध्ये जास्त व्याजदर दिला जातो. तरी या सेवेचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाने केले आहे.
ऑटोरिक्षाधारकांना क्षेत्र परवाना लावण्यास दि.30 पर्यंत मुदत
अकोला- संसदीय क्षेत्र रस्ता सुरक्षा जिल्हा अकोला बैठकीत झालेल्या ठरावानुसार रस्ते सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ऑटोरिक्षा वाहनाच्या दर्शनी भागास शहरी भागातील वाहन असल्यास हिरवा व ग्रामिण भागातील वाहन असल्यास लाल रंगाचे स्टिकर लावण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी दि.15 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि, रस्ते सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक संधी म्हणून हे स्टिकर्स लावण्यासाठी दि.30 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे. तरी ऑटो रिक्षाचालकांनी ऑटोरिक्षा संघटना जिल्हा अकोला यांच्या मार्फत रिक्षाच्या दर्शनी भागात स्टिकर्स लावुन घ्यावे. तसेच परवानाधारक ऑटोरिक्षाचालकांनी आपल्या परवाना क्षेत्रातच वाहन चालवावे, नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या