Ticker

6/recent/ticker-posts

३१ डिसेंबरनिमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना: जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अंमलबजावणीचे निर्देश

३१ डिसेंबरनिमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना: जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अंमलबजावणीचे निर्देश





 अकोला, दि.३०(जिमाका)- कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन  विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने ३१ डिसेंबर, २०२१ (वर्ष अखेर) व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सुचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी संबंधित कार्यपालन यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रात करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.कोरोनाच्या अनुषंगाने दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी व दि. १ जानेवारी २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणाने साजरे करावे.  राज्यात  २५ डिसेंबर पासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे पालन करण्यात यावे.
            कोवीड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. ३१ डिसेंबर, २०२१ व नूतन वर्ष, २०२२ चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५०% पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५% च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सुरक्षित अंतर राखले जाईल. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.


            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. तसेच ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही गृहविभागाने दिल्या आहेत.
            विशेषतः मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी इत्यादी ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करु नये. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
     

    
  नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.कोविड १९ व विशेषत्वाने ओमायक्रॉन या विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील, असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
या निर्देशांचे पालन आपापल्या कार्यक्षेत्रात होण्याच्या दृष्टीने  जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, अकोला, सर्व उपविभागीय अधिकारी,  तहसिलदार  व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी उपाययोजना कराव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.


गारपीट नुकसानीचा प्राथमिक अहवाल :२५ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; वीज पडून एकाचा मृत्यू तर २१ जनावरे दगावली



             अकोला, दि.३०(जिमाका)- जिल्ह्यात मंगळवारी (दि.२८) रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात २५ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा, कापूस, तूर, कापूस व कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. तर सातरगाव ता. बाळापुर येथे एका युवकाचा वीज पडून मृत्यू झाला असून बाळापूर तालुक्यातच २१ जनावरे दगावली आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार अकोला तालुक्यात १२ हजार ५४५ हेक्टर, बार्शी टाकळी तालुक्यात १०७४ हेक्टर,  बाळापूर तालुक्यात ९५७१ हेक्टर,  पातुर तालुक्यात १६० हेक्टर, मुर्तिजापूर तालुक्यात २६०० हेक्टर असे एकूण २५ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने गहू, हरभरा, कापूस, तूर या पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी कांदा तसेच भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. तसेच बाळापूर तालुक्यात सातरगाव येथे रविंद्रसिंह चतुरसिंह चव्हाण(वय २७) या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला तर बटवाडी येथे सात बकऱ्या व १५ मेंढ्या वीज पडून दगावली आहेत,असे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

गुटखा विक्री प्रकरणी चोहोट्टा बाजार येथील किराणा व्यापाऱ्यास अटक



             अकोला, दि.३०(जिमाका)- जिल्ह्यातील चोहोट्टाबाजार ता. अकोट येथे प्रतिबंधित अन्नपदार्थांची (गुटखा, पानमसाला,सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी. खर्रा) विक्री करणाऱ्या किराणा व्यापाऱ्यावर बुधवारी (दि.२९)  कारवाई करुन अटक करण्यात आली. या व्यापाऱ्या विरुद्ध  दहिहांडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती  सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन सा. द. तेरकर यांनी दिली आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, मे. शाहिद किराणा, मेन रोड, चोहट्टा बाजार, ता. अकोट, जि. अकोला येथे बुधवारी अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी धाड टाकली. या दुकानात प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री होत होती असेच प्रतिबंधीत अन्न पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या साठ्याची किंमत ८७९० रुपये इतकी आहे. याप्रकरणी दुकानाचा मालक शेख शहीद शेख इसहाक यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६(२),(i),२६(२)(iv) तसेच भादंवि कलम  ३२८, १८८, २७२, २७३ नुसार दहिहांडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी केली असून कार्यवाहीत कार्यालयाचे नमुना सहायक बी. एच. नरवणे हे सहभागी होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या