भूसंपादनच्या उचित भरपाईसाठी कृती समितीचे आंदोलन
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा
मूर्तिजापूर रेल्वे उड्डाणपुलाकरिता भूमिसंपादन व पुनर्वसनाकरिता उचित मोबदला न मिळाल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दंड बैठका आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रेल्वे उड्डाणपूल विस्थापित संघर्ष कृती समितीने जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
भू-संपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांनी रेल्वे उड्डाणपूल परिसरातील रहिवाशांना २४ मे रोजी उपविभागीय अभियंता सा. बां. उपविभाग मूर्तिजापूर यांच्यामार्फत नोटीस बजावल्या आहेत. तथापि, भूमिसंपादन करताना उचित भरपाई मिळण्याची प्रक्रिया काय? याबाबत कोणतीही सविस्तर मार्गदर्शक सूचना नोटीससोबत रहिवाशांना देण्यात आली नाही. कार्यालयातदेखील याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तर भूसंपादन हे थेट खरेदी करून खासगी वाटाघाटीव्दारे घेण्याबाबत नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे शासकीय कामासाठी खासगी वाटाघाटी कशा ? असा सवाल कृती समितीने केला आहे. नागरिकांना सुधारित नोटीस बजावण्याबाबत भू-संपादन अधिकारी तथा उप- विभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना आदेशित करावे, अशी मागणी पूल विस्थापित संघर्ष कृती समितीने जिल्हाधिकारी यांना केली आहे. अन्यथा, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी विस्थापित कुटुंबीय, ग्रामस्थ तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते न्याय हक्काच्या मागणीच्या समर्थनार्थ आणि प्रशासनाच्या बेकायदेशीर वृत्तीच्या निषेधार्थ दंड बैठका आंदोलन करतील, असा इशारादेखील निवेदनातून दिला आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या