अकोल्यात 'रीवा-पुणे' आणि 'दुरंतो' गाड्यांना थांबा द्यावा, आ. साजिद खान यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना मागणी
अकोला – अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठान यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून रीवा-पुणे साप्ताहिक एक्सप्रेस (गाडी क्रमांक 20151/20152) व नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांचा थांबा अकोला रेल्वे स्थानकात देण्याची मागणी केली आहे.
पठान यांनी पत्रात नमूद केले आहे की, अकोला हे नागपूर व भुसावळ दरम्यानचे एक महत्त्वाचे वाणिज्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक केंद्र आहे. येथे दररोज हजारो प्रवासी रेल्वेचा वापर करतात व अकोला स्टेशन रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवून देते. मात्र, अलीकडे सुरू झालेल्या रीवा-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसला वर्धा ते भुसावळ दरम्यान कुठेही थांबा नसल्याने अकोल्यासारख्या महत्त्वाच्या स्थानकाची सरळपणे उपेक्षा झाली आहे.तसेच, नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस सारख्या गर्दीच्या गाडीचा देखील अकोल्यात थांबा नाही. अकोलामधून मुंबई व नागपूरकडे दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करतात, अशा स्थितीत या गाड्यांना अकोल्यात थांबा न दिला जाणे अन्यायकारक आहे, असेही पठान यांनी स्पष्ट केले आहे.
अकोल्यातील जबलपूर जाणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. परिणामी जबलपूर जाण्यासाठी अकोल्यातील लोक अमरावती येथे जाऊन तेथून जबलपूर येथे रेल्वेने जातात. आता रीवा - पुणे ही नवीन रेल्वे सुरू झाली असून अकोल्यावरून जात असल्याने या रेल्वेला थांबा देण्यात यावा अशी मागणी आ. साजिद खान यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे केली आहे.
तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत:
रीवा-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसला अकोल्यात थांबा द्यावा.
नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेसलाही अकोल्यात थांबा द्यावा.
रेल्वे प्रशासनाने त्वरित या मागण्यांची सकारात्मक दखल घ्यावी.
0 टिप्पण्या