Ticker

6/recent/ticker-posts

मान्सूनच्या मोसमी पावसाची बुलेट ट्रेन,रविवारी नियोजीत वेळेपूर्वीच,राज्यात दाखल

मान्सूनच्या मोसमी पावसाची बुलेट ट्रेन,रविवारी नियोजीत वेळेपूर्वीच,राज्यात दाखल


 वाशिम : वाशिम जिल्ह्याच्या रुई गोस्ता येथील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित,सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल पाटील गावंडे यांचा हवामानाचा अंदाज दांडगा आहे.त्यांनी दोन महिने पूर्वीच,ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचेशी भ्रमण ध्वनीवरून संवाद साधतांना, "चालू वर्ष २०२५-२६ हे आपल्या राज्यातील शेतकरी,ग्रामस्थ आणि सरकार यांच्याकरीता, चांगल्या पाऊसमानामुळे सुजलाम् सुफलाम् राहणार असल्याचे व मान्सूनचा पाऊस लवकर येणार असल्याचे तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी वर्तमानपत्राद्वारे दिलेली शुभवार्ता प्रत्यक्षात उतरविणारे असल्याचे स्पष्ट केले. होते.हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी,यावर्षी नियोजीत वेळेपूर्वी मान्सूनचे आगमन होऊन पावसाळ्याचा आरंभ लवकर होण्याची आणि चालू हंगामात भरपूर पाऊस होणार असल्याचे भाकितच मांडले होते." सध्या बंगालच्या उपसागरापासून तर अरबी समुद्रापर्यंत कमि दाबाचा पट्टा तयार होऊन,ताशी ४० ते ५० किमी वेगाने मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुरु झालेली आहे.मान्सूनच्या पावसाला पूरक वातावरण तयार झाल्यामुळे मागील आठवड्यातच मान्सून केरळमध्ये दाखल झालेला होता. 



मान्सूनच्या आगमनाची केरळमधील ही वार्ता,संजय कडोळे यांनी आपल्या वार्तापत्रामधून दैनिक विश्वजगत, दैनिक विदर्भ कल्याण, साप्ताहिक करंजमहात्म्य, युवाक्रांती समाचारद्वारे मागील आठवड्यातच कळवीली होती. व पुढील आठवड्यात,संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मान्सून येणार असल्याची शक्यता दिली होती . त्यानुसार,आता मात्र मान्सूनची बुलेट ट्रेन अतिजलद गतीने,रखरखत्या उन्हाळ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या वैशाखातच रोहिणी नक्षत्राच्या आगमनासोबतच कोकण किनारपट्टी,मुंबई सह राज्यात,रविवारी दि.२५ मे २०२५ रोजीच येऊन धडकली आहे.सध्या राज्यात वळवाच्या अवकाळी पावसाने उच्छाद मांडलेला असतांनाच मान्सूनच्या मोसमी पावसाचेही धुमधडाक्यात आगमन झाले आहे.या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांच्या म्हणण्यानुसार, 'रोहिणी आणि मृगाच्या बहिनी.' असे या रोहिनी नक्षत्रा बद्दल बोलल्या जाते. "ज्या ज्या वर्षी रोहिनीचा पाऊस बरसतो.त्या त्या वर्षी संपूर्ण पावसाळ्याचा पाऊस चांगला होतो.हा वयोवृद्ध शेतकऱ्यांचा अनुभव आहे.इथे आता तर रोहिनी नक्षत्रच मान्सूनला सोबत घेऊन आले आहे.त्यामुळे यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांना चांगला हंगाम देवून सुख,संपत्ती प्रदान करणारा राहील.असा विश्वास परमेश्वरावर ठेवायला हरकत नाही." असे संजय कडोळे यांनी म्हटले आहे. साधारणतः मे महिना आणि वैशाखाचा महिना म्हटले म्हणजे ४० अंश सेल्सियस व त्यापुढेही जाऊन तापमानाचा उच्चांक गाठणारा महिना म्हणून ओळखल्या जातो.मात्र यंदा १२ मे २०२५ नंतर बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात,पर्यावरणीय बदलामुळे वळवाच्या अवकाळी पावसाचे वातावरण तयार होऊन,जवळ जवळ संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळीमुळे तापमानही झपाट्याने खाली आले.मात्र ढगांच्या गर्दीमुळे उकाडा कायम आहे.हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या तर्कानुसार चालू आठवड्यात कोकण किनारपट्टी,मुंबई,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,पूर्व विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून,पश्चिम विदर्भ आणि इतर ठिकाणी कोठे दमदार तर कोठे रिमझिम पाऊस होणार आहे.उल्लेखनिय म्हणजे गेल्या आठवड्यात आणि रविवारी वळवाच्या पाऊसाने दुपारनंतर धुवाँधार बॅटींग केल्याचे दिसून आले.अनेक जिल्ह्यात रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू होता.चालू आठवड्यात दि. ०१ जून २०२५ पर्यंत भाग बदलवीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. साधारणतः काही भागात दुपारी भयंकर उन्हं तापून,दुपारनंतर सायंकाळी व रात्री पावसाची शक्यता आहे.आपण अनुभवले गेल्या आठवड्याच्या पावसाने कोकण किनारपट्टी,मुंबई,पुणे, सोलापूर,पंढरपूर ,नाशिक, चंद्रपूर,भंडारा,गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यातील नदीनाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे.तसेच नाशिक मधील सिन्नर, मराठवाड्यात आकाशातून विजा पडल्यामुळे सरकारी मालमत्तेसह अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शिवाय अवकाळी पावसानेही ठिकठिकाणी,आंबा, द्राक्ष,केळी,फळबागा,फुलबागा आणि कांदा,भाजीपाला इत्यादी सह उन्हाळी पिकाचे नुकसान झाले आहे.अशाच प्रकारे चालू आठवड्यातही राज्यात अनेक ठिकाणी विजा पडण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे नागरीकांनी सतर्क रहावे. राज्यात मान्सून दाखल झाला असतांनाच,पश्चिम विदर्भात व इतरत्रही अनेक जिल्ह्यात अद्यापही शेतीच्या मशागतीची नांगरणी,वखरणीची कामे बाकी असल्याचे अनेक ठिकाणाहून शेतकऱ्यांनी कळवीले आहे. अनेक शेतकऱ्याच्या शेतात तर पावसाळ्यातील पावसाप्रमाणे चिखल झालेला आहे.त्यामुळे त्यांना सूचित करण्यात येते की, निसर्गराजा जसजसी उघाड देईल. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी, सकाळ ते दुपारपर्यंत आपल्या शेतजमिनीच्या नांगरणी, वखरणी,मशागतीची कामे आटोपून घ्यावी.दुपार नंतर मात्र आकाशात ढगांची दाटी दिसताच,शेतामधून गावाच्या दिशेने घराकडे परतावे.आपला व इतरांचा,आपल्या गुरेढोरे, शेळ्यामेंढ्याचा बचाव करावा. पाऊस सुरू झाल्यास ढगाच्या गडगडाटात शेतात किंवा उघड्यावर थांबू नये.हिरव्या झाडाखाली झाडाच्या आश्रयाला अजिबात जाऊ नये.जास्त प्रमाणात पाऊस होऊन नदीनाले,गटार,पांदन रस्ते, नदीनाल्यावरील पुल ओलांडून जाऊ नये.आपली दुचाकी असो वा चारचाकी,बैलगाडी अथवा बसगाडया किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये टाकू नये. स्वतःहून आपला व इतरांचा जीव धोक्यात घालवू नये.विजा कडाडत असतांना मोबाईल वर बोलू नये. युट्युबचे गाणे ऐकू नये.ट्रॅक्टरवर बसू नये.विजेवर चालणारी यंत्र व उपकरण बंद ठेवावे.


आपल्या घराच्या आसपास व शेतात विद्युत तारा तुटलेल्या किंवा लोंबकाळणाऱ्या असल्यास शासनाच्या विद्युत विभागाला सूचना देवून दुरुस्त करून घ्याव्यात.आपले घर किंवा इमारत जिर्ण वा धोकादायक असल्यास अशा इमारती मधून अन्यत्र राहण्यास जावे. धोकादायक इमारती पावसाळ्यात अचानक कोसळून गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वप्रथम आपली व आपल्या कुटूंबीयांच्या आरोग्याची व जीवीताची काळजी घ्यावी.तसेच महत्वाचे म्हणजे तयार जमिनीमध्ये, पेरणीसाठी अत्यावश्यक असलेले भरपूर पाणी जमिनीत मुरल्या शिवाय आणि राज्याच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाशिवाय पेरणी करण्याची घाई करू नये.त्याच प्रमाणे अचानक केव्हाही एखादी आपात्कालिन परिस्थिती उद्भण्याची शक्यता गृहीत धरून, आपात्कालिन संस्था, तहसिलदार, कृषी अधिकारी,मंडळ अधिकारी,तलाठी (पटवारी), ग्रामसेवक,पोलिस निरिक्षक, अग्निशामक यंत्रणा,फॅमिली डॉक्टर,आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी,रुग्नवाहिका यांचे संपर्क भ्रमणध्वनी नंबर आपल्या जवळ असू द्यावे.असे आवाहन हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांचे वतीने पत्रकार संजय कडोळे यांनी केले आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या