महामार्ग झाला मृत्यूमार्ग! दररोजचे अपघात, प्रशासन गप्पच!
तालुका प्रतिनिधी संतोष माने :
मूर्तिजापूर, 29 मे — गोंदिया वरून धुळे कडे भरधाव वेगात निघालेली ईर्टीगा (MH 18 9900) ही कार 28 मे च्या रात्री उडाण पुलावरून खाली उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने थेट सर्व्हिस रोडवर जाऊन उलटली. बॅरिकेट तोडून वाहनाने तीन ते चार पलट्या घेत भीषण स्वरूपाचा अपघात घडवला. या अपघातात गोपाल सोनवणे व चालक गोपाल गोसावी (दोघेही धुळेचे) गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल राठोड, उज्वल विल्हेकर, साहिल मुलाणी व चालक साजिद खान यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जखमींना 108 रुग्णवाहिकेने मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोल्याला रेफर करण्यात आले. 29 मे सायंकाळी त्यांची प्रकृती सुधारते आहे, अशी माहिती मिळाली. परंतु केवळ ही एक घटना नाही, याच महामार्गावर मंगळवारी सकाळी पैलवाड्याजवळ अजून एक वाहन दोन पलट्या खात अपघातग्रस्त झाले होते, त्यातही तीन जण जखमी झाले. ही अपघातांची मालिका थांबत नाहीये!
राष्ट्रीय महामार्ग की अपघातांचा अखंड मार्ग?
सुसाट रस्ते आणि वाहनचालकांच्या बेफिकीर वेगामुळे महामार्ग आता मृत्यूचा मार्ग ठरू लागला आहे. अपघातानंतर अपघात घडत आहेत, पण तरीही प्रशासन, परिवहन विभाग व रस्ता सुरक्षा यंत्रणा गाढ झोपेत आहेत.
किती जखमी, किती मृत्यू लागतील, प्रशासनाला जाग यायला?
वाहनचालकांच्या वेगावर नियंत्रण, आवश्यक ठिकाणी गतिरोधक, स्पष्ट सूचना फलक, प्रकाशव्यवस्था आणि सक्रिय गस्त या बाबी राबवणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा हा महामार्ग ‘राष्ट्रीय मृत्यूमार्ग’ होण्यास वेळ लागणार नाही.
याबाबत अद्याप कोणतीही तक्रार मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली नाही.
0 टिप्पण्या