दगडपारवा रोहित्राचा दहशतवाद! थोडक्यात वाचला शेतकरी; महावितरण कुठे झोपलंय?
प्रतीनीधी- संतोष माने
बार्शीटाकळी – अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा शेतशिवरातील विद्युत रोहित्र गावकऱ्यांसाठी जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. याठिकाणी असलेल्या शेत रस्त्यावर आज, ६ मे रोजी दुपारी जोरदार स्पार्कींग झाल्याने रोहित्रातील केबल वायर जळून थेट खाली पडल्या. नेमक्या त्या वेळी बाजूलाच असलेल्या शेतकऱ्याचा थोडक्यात जीव वाचला. अचानक झालेल्या आवाज व धुरामुळे शेतकऱ्याला घाबरगुंडी सुटली.
हे रोहित्र गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक अवस्थेत असून दर एक-दोन दिवसांत शॉर्टसर्किट होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या मार्गावरून शेतकरी, कामगार व ग्रामस्थांचा नियमित वावर असतो. तरीही महावितरण विभागाचे याकडे दुर्लक्ष सुरूच आहे.
सध्या हवामानात अचानक बदल होत असून, अवकाळी पावसाची शक्यता आणि जवळ येणारा पावसाळा लक्षात घेता रोहित्राची अवस्था आणखी भयावह होणार आहे. अशा परिस्थितीत जर कोणतीही दुर्घटना घडली, तर त्यास जबाबदार कोण असेल? हा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत. गावकऱ्यांनी महावितरणकडे रोहित्राचे तात्काळ नवेकरण करण्याची जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने जागे होऊन त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या