Ticker

6/recent/ticker-posts

'सीताबाई'मध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवितावाचन

'सीताबाई'मध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवितावाचन


  अकोला: दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित स्थानिक सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि वऱ्हाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने (MOU)अंतर्गत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविता वाचनाचे आयोजन करण्यात आले. मराठी भाषेचे संवर्धन व्हावे शिवाय कवी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा परिचय व्हावा, भाषा आणि साहित्य याविषयी ज्ञान व्हावे आणि वेगवेगळे साहित्यप्रकार कथा, कादंबरी, कविता यातले वेगळेपण विद्यार्थ्यांना कळावे, याकरिता कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


 या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभाग प्रमुख प्रा. भास्कर धारणे होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध पत्रकार, लेखक, प्रकाशक, कवी राजू चिमणकर हे आणि विशेष अतिथी म्हणून प्रख्यात कादंबरीकार पुष्पराज गावंडे लाभले होते. कार्यक्रमाप्रसंगी राजू चिमणकर यांनी कविता लेखन आणि कविता लेखनाच्या प्रारंभाविषयी मार्गदर्शन केले. खरी कविता कशी असते, ती कशी रुजते हे सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनी आपल्या खुमासदार शैलीत वऱ्हाडी बोली मधून आपले विचार मांडले. तसेच कादंबरी लेखन किती किचकट असते याचे उदाहरणासह स्पष्टीकरण केले. अनेक उदाहरणांच्या आधारे त्यांनी विविध साहित्य प्रकारांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. भास्कर धारणे यांनी काव्यवाचन कसे करावे, त्यातील आशय कसा उलगडावा, तो शब्दांमधून कसा व्यक्त होतो, हे स्पष्ट केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, सुखदेव ढाणके आणि दासू वैद्य यांच्या कवितांचे अर्थपूर्ण वाचन केले. यामध्ये प्राजक्ता वाडेकर, मानसी काळकोंडे, श्रद्धा यादव, पूनम शिरसाट, अमोल मुळे, वैष्णवी वरणकार, प्रतिभा येवले, अश्विनी कोकाटे, प्राची काळे, प्रतिभा चिकटे, माधुरी कानपुरे, प्रीती तिरकर, फारेहा उरुज पठाण आणि विनोद देवतळे या विद्यार्थ्यांनी पण नामावंत कवींच्या कविता सादर केल्या, काही विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या कविता सुद्धा सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन बनसोड एम. ए. भाग 2 या विद्यार्थ्यांने केले तर आभार शिवा हागे एम. ए. भाग 2 याने मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिपाली सोसे यांनी केले. या प्रसंगी प्रा. डॉ. कैलास वानखडे यांनी कवितेचे अर्थपूर्ण वाचन कसे करावे याचे उदाहरण म्हणून कवी नितीन चंदनशिवे यांची 'आमचा कांबळे' ही सामाजिक वास्तव दर्शविणारी कविता सादर केली. सोबतच कवितेविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध कादंबरीकार श्री पुष्पराज गावंडे यांचा परिचय डॉ. सविता रेखे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध कवी, प्रकाशक, पत्रकार, राजू चिमणकर यांचा परिचय प्रा. उज्वला डांगे यांनी करून दिला. कार्यक्रमाला मराठी विभागातील प्रा. डॉ. हरिचंद नरेटी, प्रा. सुनीती डाबेराव, प्रा. अर्चना बोंडे, प्रा. सीमा चिमणकर, यांच्यासह एम. ए. मराठी भाग 1 व 2 चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या