अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीचा कहर! – आमदार हरीश पिंपळे यांच्या विधानसभेतील घणाघाती भाषणानंतरही पोलिसांची कुंभकर्णी झोप सुरूच!
मूर्तिजापूर : अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीचा सुळसुळाट सुरू असून, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोला ग्रामीण, पातूर आदी तालुक्यांमध्ये अवैध वाहतूक उघडपणे सुरू असल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. नुकत्याच मूर्तिजापूर शहरात दर्यापूर नाका येथे 30 म्हैसवर्गीय गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक करताना दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. जनावरांना दाबून, बांधून, अनैतिक मार्गाने हलवणे — ही गोमातेंची विटंबना नसून तरी काय?
पिंपळेंच्या घणाघाती विधानामुळेच बार्शीटाकळी ठाणेदाराला झाली शिक्षा!
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, स्थानिक आमदार हरीश पिंपळे यांनी याआधी विधानसभेत आवाज उठवत म्हटले होते की,"जिल्ह्यातील पोलिस प्रशासन काही ठिकाणी गोवंश तस्करांना अप्रत्यक्ष संरक्षण देत आहे. धार्मिक भावना दुखावणाऱ्या अशा घटनांवर जर कठोर कारवाई झाली नाही, तर जनतेचा उद्रेक रोखता येणार नाही."या ठाम भूमिकेमुळेच बार्शीटाकळीच्या गाजलेल्या गोवंश तस्करी प्रकरणात थेट ठाणेदाराला निलंबित व्हावे लागले, ही वस्तुस्थिती आहे.
गाजलेली प्रकरणं, पण परिणाम शून्य!
फेब्रुवारी 2025: बार्शीटाकळी परिसरातून पकडलेली 42 जनावरे, चालक पळून
मार्च 2025: अकोला ग्रामीण हद्दीत तस्करीच्या वाहनाचा अपघात – 2 जनावरांचा मृत्यू
एप्रिल 2025: पातूर मार्गावर रात्री पकडलेली ट्रकभर गोवंश जनावरे – आरोपींचा सुटकेसाठी राजकीय दबाव
या प्रकरणांमध्ये एकही ठोस शिक्षा झाल्याचे उदाहरण नाही. परिणामी तस्करांची बेधडक हालचाल सुरूच आहे.
नागरिकांचा संताप उफाळून आला!
स्थानिक प्राणीप्रेमी कार्यकर्ते राहुल देशमुख म्हणाले, "प्रशासन फक्त पकड करून मोकळं होतं, पण मूळ साखळीवर कुठेच घाव नाही. हाच प्रकार चालू राहिला, तर आम्हालाच रस्त्यावर उतरावं लागेल."
शहरातील नागरिक रमेश इंगोले यांचे थेट शब्दात म्हणणे आहे, "गोमातेला आखूड दोऱ्यांनी बांधून नेतात आणि आपण सोशिक बनून फक्त बघत बसतो. ही मूक संमती आम्ही आता देणार नाही."
पोलीस प्रशासनाला आता शब्द नव्हे, कृती दाखवावी लागेल!
लोकप्रतिनिधी थेट विधानसभेत आवाज उठवतात, नागरिक उघडपणे संताप व्यक्त करतात, तरीही गोवंश तस्करी सुरूच आहे. यापुढे केवळ वाहन जप्त करणे आणि आरोपी सोडून देणे हा प्रकार चालणार नाही. गोवंश तस्करांवर मोक्का, गुन्हेगारी षडयंत्र व धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी जनतेची जोरदार मागणी आहे.
0 टिप्पण्या