पाणी गुणवत्ता राखण्यासाठी गाव स्तरीय यंत्रणा सक्षम करावी - मुख्य कार्यकारी अधिकारी बी .वैष्णवी यांचे प्रतिपादन
अकोला : दिनांक 8 जानेवारी :
जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी विविध स्तरावर यंत्रणा काम करीत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, शाश्वत, दररोज मानसी 55 लिटर पाणीपुरवठा करून देत असताना पाणी गुणवत्तेसाठी गाव स्तरीय जलसुरक्षक व पाच महिला यांची महत्वाची भूमिका आहे, त्याना प्रशिक्षित करून सक्षम करावे व त्यांच्या मार्फत ग्रामस्थांना शुद्ध पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्नरत राहावे, नियमित आढावा घेऊन दस्तऐवजीकरणाकडे भर द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी केले. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत दिनांक 5 जानेवारी रोजी आयोजित जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेत त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी जल जीवन मिशन विभागाच्या प्रकल्प संचालक अनिता तेलंग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागाचे वरिष्ठ भू वैज्ञानिक श्री संजय कराड, श्री. बरडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री दरेकर, गटविकास अधिकारी श्री गजानन अगर्ते, श्री ज्ञानेश्वर रुद्रकार, श्री मिलिंद मोरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक श्रीमती अनिता तेलंग यांनी केले.
ही कार्यशाळा गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत व आरोग्य, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ व रसायनी यांच्याकरिता आयोजित करण्यात आली होती. यावेळी जनजीवन मिशनच्या एमआयएस बाबत मूल्यमापन व एम आय एस बाबत कु. देवांगणी काळे यांनी तर जल जीवन मिशन चे मार्गदर्शक सूचना बाबत माहिती, शिक्षण, संवाद सल्लागार राजेश डहाके यांनी मार्गदर्शन केले. पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण प्रणाली व इतर विषयाची सखोल माहिती पाणी गुणवत्ता तज्ञ कु. ममता गनोदे यांनी दिली. तसेच रसायनी श्री म्हात्रे यांनी सुद्धा यावेळी मार्गदर्शन केले. तर सूत्रसंचालन श्री राजेश डहाके यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ञ सल्लागार यांनी सहाय्यक लेखाधिकारी श्री. संदीप नृपनारायण व कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री ओमप्रकाश बरेठी यांचे मार्गदर्शनात परिश्रम घेतले.
जल जीवन मिशन च्या जन जागृतीसाठी लघुपटनिर्मिती स्पर्धा
अकोला : जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार प्रसिद्धीसाठी व ग्रामस्थांमध्ये जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येत्या 31 जानेवारी 2024 पर्यंत या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन च्या प्रकल्प संचालक श्रीमती अनिता तेलंग यांनी केले आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल देण्यासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. त्याच्या प्रबोधनासाठी जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्या मार्गदर्शनाखाली लघुपट स्पर्धा होत आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक मिळविणा-या स्पर्धकांना अनुक्रमे ३१ हजार, २१ हजार व ११ हजार रुपये बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी लघुपटाची स्वत: निर्मिती करणे आवश्यक आहे तसेच पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पार्श्वसंगीत, गीत, चित्रीकरण स्वतः तयार केलेले असावे. अगोदर प्रकाशित झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकीय विभागांनी त्यांच्या कामासाठी तयार केलेले लघुपट स्पर्धेसाठी सादर करू नयेत असा नियम ठेवण्यात आला आहे.
लघुपट सादर करतांना कॉपी राइटबाबतचे उल्लंघन होत नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र स्पर्धकास सादर करणे बंधनकारक आहे. लघुपट निर्मितीसाठी वापरलेले शूटिंग, साहित्य, व्यावसायिक दर्जाचे व उत्तम असावे. लघुपट निर्मितीसाठीच्या भाषेचा वापर हा मराठी प्रमाण भाषेचा असावा त्याद्वारे कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावणार नाही याची स्पर्धकांनी काळजी घ्यावी. लघुपट स्पर्धेसाठी एक स्पर्धकाला एकाच विषयावरील लघुपट सादर करता येईल. लघुपट तीन ते पाच मिनिटांचा असावा. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे ३१ हजार, २१ हजार व ११ हजार रुपये बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. लघुपटाचे विषय पुढीलप्रमाणे - १) पाण्याचे शाश्वत स्रोत. २) पाणी पुरवठा -देखभाल दुरुस्ती ३. जल संवर्धन ४) हर घर जल घोषित गाव विकास.५) जल जीवन मिशन यशोगाथा ६) विविध योजनांचे कृतीसंगम. सदर लघुपट स्पर्धेत सहभाग नोंदवून आपले लघुपट पेनड्राईव्हमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, आगरकर विद्यालय परिसर, रेल्वे स्टेशन रोड, अकोला येथे येत्या ३१ जानेवारी २०२४ पर्यंत सायंकाळी 5.00 वाजे पर्यंत सादर करावे, असे आवाहन प्रकल्प संचालक श्रीमती तेलंग यांनी केले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या