निवडणूकीत हवी योग्य पक्षांची रस्सीखेच
सत्ताधारीच्या बरोबरीत जर असले विरोधक तरच कारंजा नगरीचा विकास शक्य .* कारंजा : सध्याचे हवामान किंवा वातावरण ज्याप्रमाणे प्रदूषणाने दुषीत झालेले आहे . त्याचप्रमाणे विविध पक्षांचे राजकारण सुद्धा गटबाजीच्या प्रदूषणाने दुषीत झालेले असल्याचे आढळून येते आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे जुन्या मुरब्बी राजकारण्यांना विश्वासात न घेता राज्यश्रेष्ठी किंवा जिल्हा अध्यक्षांनी विविध पक्षात केलेल्या नवख्या व्यक्तिंच्या नियुक्त्या हे होय . नवख्या व्यक्तिच्या नियुक्त्यांनी स्थानिक पातळीवरील जुने ,जाणते , मुरब्बी राजकारणी नेते पक्षनिष्ठ असूनही पक्षातून दुरावल्याचे दिसून येत आहे . राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा इत्यादी अनेक पक्षातील स्थानिक नेते , नगर पालिकेचा गड लढविणारे झुंजार नेतृत्व त्यामुळे वेगळे पडले आहेत . आणि त्यामुळे जवळपास प्रत्येक पक्षातच अंतर्गत गटबाजी दिसून येत आहे . आणि गटबाजी दूर होऊन पक्षाला एकत्रीकरणाची बळकटी जोपर्यंत येत नाही . तोपर्यंत अनेक पक्ष नेतृत्वहिनच राहणार असे चित्र दिसत आहेत . आणि म्हणून येत्या नगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाचे अस्तित्व टिकविण्याकरीता राज्यपातळीवरून प्रत्येक पक्षाच्या संपर्क नेते व पक्ष निरिक्षक यांनी स्थानिक पातळीवरील थोरा - मोठ्यांच्या समजूती काढून प्रत्येक पक्षाला नवसंजीवनी देणे अत्यावश्यक ठरणार आहे .
तेव्हा आता बघावे लागणार की, पक्षश्रेष्ठी स्थानिक पातळीवरील पक्षनिष्ठ पण नाराज असलेल्या जुन्या जाणत्या अनुभवींना विश्वासात घेवून त्यांचेवर जबाबदारी टाकणार काय ? आणि आजचे तरुण व हौसी पक्षकार्यकर्ते कमीतकमी आपल्या कारंजा नगरीच्या विकासासाठी जुन्या जाणत्या अनुभवी नेतृत्वाला पुढे करून त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार होतील काय ? आणि जुने जाणते स्थानिक नेते सुद्धा प्रामाणिक ,होतकरू, विश्वासू व लढवय्या समाजसेवी तरुणांची काळजी घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना नगर पालिका निवडणूकीकरीता पुर्णार्थाने तयार करून कारंजा नगरीचा विकास करतील काय ? की आपल्या स्वस्वार्थापायी, अहंभाव ठेवीत गटबाजीच सुरु ठेवतील ? प्रत्येक पक्षातील गटबाजी संपली तरच स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाला आपले अस्तित्व टिकवून कारंजा नगर पालिका निवडणूकीचा आनंद घेता येईल . व प्रत्येक पक्षाचे शिलेदार नगर पालिकेत पोहचून कारंजा नगरीचा विकास साधता येईल . तसेच लोकशाही व्यवस्थेत निवडणूक सुद्धा एकतर्फी व्हायला नकोच . नगर पालिकेत सत्ताधारीच्या बरोबरीत विरोधक सुद्धा असले तरच कारंजा नगरीचा विकास साधता येऊ शकेल .असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे .
0 टिप्पण्या