स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - जिल्हा प्रशासनातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा स्पर्धा;नाव नोंदणीचे आवाहन
अकोला- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग (माध्यमिक) व श्री. समर्थ पब्लीक स्कूल, रणपिसे नगर अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त किल्यांचे महत्व व शिवरायांचा इतिहासाबाबत जनजागृती व्हावी याकरीता जिल्ह्यातील सर्व शाळास्तरावर किल्ले बनविण्याची स्पर्धा गुरुवार दि.१७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभागी व्हावे, त्यासाठी नाव नोंदणी करावी,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.
किल्ला स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या स्पर्धेकांनी नोंदणीकरीता संपर्कः-
जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले (मो.नं.9763567169),
जिल्हा परिषद शिक्षण विभाग(माध्यमिक) शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव(मो.नं.7745820831), श्री. समर्थ पब्लीक स्कूलच्या सुर्वणा गुप्ता (मो.नं.9404090806)
श्री. समर्थ पब्लीक स्कूल व जूनिअर कॉलेजचे(सीबीएसई) (मो.नं.9359811694) यांच्याशी संपर्क साधावा.
तसेच स्पर्धेच्या नियम व अटीसंबंधी माहितीकरीता आशिष चवथे(कला शिक्षक) (मो.नं.9881581838) यांच्याकडे संपर्क साधावा.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तीन विजेत्यांना श्री. समर्थ पब्लीक स्कूल, रणपिसे नगर अकोला यांच्याव्दारे प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, व्दितीय पोरितोषिक तीन हजार रुपये, तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये व प्रोत्साहनपर एक पारितोषिक एक हजार रुपये देण्यात येणार आहे. स्पर्धेकांचे मुल्यांकनासाठी शिक्षणधिकारी(माध्यमिक) यांच्या नियंत्रणाखाली मुल्यमापन समितीचे गठन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे मुल्यमापन शुक्रवार दि. 18 फेब्रुवारी रोजी किल्ले केलेल्या प्रत्यक्ष ठिकाणी जावून करण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी
अकोला- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दि. १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. कोरोना विषाणुच्या ओमिक्रॉन प्रजातीचे संक्रमणाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन साजरा न करता आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने गृहविभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करुन उत्सव साजरा करा, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.
गृह विभागाचे निर्देशः-
छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती) साजरी करत असताना शिवज्योत वाहण्याकरिता २०० भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरिता ५०० भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. अनेक शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी अथवा इतर गड / किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतात. परंतु, यावर्षी कोविड -१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करावा.
दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
कोविड-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे सर्वांवार बंधनकारक आहे, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या