रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा भारतीय किसान संघटनेचा इशारा
मुर्तीजापुर :महाराष्ट्रासह मूर्तिजापूर तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यात सोयाबीन तूर गहू हरभरा कपासी फळबागा व भाजीपाला आदि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने तो हिरावून घेतला आहे. म्हणून शेतकरी हवालदिल होवून तो आर्थिक संकटात सापडला आहे. शासन स्तरावर शेतीच्या पिकाचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या संयुक्तरीत्या करण्यात आले पण त्यात तफावतच दिसून येत आहे. सन 2022 -23 आणि 2023-24 खरीप हंगामाची नुकसान भरपाई कृषी अधिकारी व पिक विमा कंपनीचे अधिकाऱ्यांच्या साठलोट्यामुळे तसेच जनप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे अद्याप पर्यंत मिळाली नाही.यामुळे तालुक्यातील शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर आक्रमक झाल्या आहे.
आज 1 जुलै 2024 रोजी कृषी दिनाच्या दिवशी मुर्तीजापुरात भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत संघटनेचे राहुल राठी, आनंद बांगर व विनोद तायडे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा निघाला असून दर्यापूर नाक्यापासून ते तालुका कृषी अधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकला.
सन 2022-23 व 2023-24 या खरीप व रब्बी पिक विमा बाबत ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रारी केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे कंपनीने पंचनामे केले नाहीत अशा शेतकऱ्यांचे ताबडतोब शंभर टक्के नुकसान ग्राह्य धरून पिक विमा शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात यावा तसेच या शेतकऱ्यांचा सर्वे झाला परंतु अद्याप पर्यंतही पिक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना ताबडतोब पीक विम्याचे पैसे शेतीच्या खात्यात जमा करण्याचे आदेश द्यावे.ज्या शेतकऱ्यांनी कपाशी बाबत तक्रारी केलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी ग्राह्य धरून पेरणी अगोदर त्या शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा अन्यथा येणाऱ्या काळात भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.सदर निवेदनाच्या प्रत तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांना रवाना करण्यात आले.ह्यावेळी भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत संघाचे राहुल राठी आनंद बांगर विनोद तायडे यांच्यासह तालुक्यातील विविध शेतकरी संघटनेचे शेतकरी बांधव व महिला शेतकरी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी निदर्शने व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे परंतु शेतकरी हितासाठी स्वतः शहरातील व तालुक्यातील शेतकरी एक संघ होऊन जन आक्रोश मोर्चा काढून शासनाने तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा आहे.ह्या शेतकऱ्यांच्या मोर्चाने खरा कष्टकरी शेतकरी जागृत झाल्याचे चित्र दिसून आले आहे.तालुका कृषी अधिकारी व तहसील कार्यालयावर मोर्चा येणार असल्याने शहर पोलीस ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या नेतृत्वात शहर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता.मोर्चात शेतकऱ्यांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून शासन व प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या