Ticker

6/recent/ticker-posts

नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी यंत्रणांनी प्रलंबित कामे पुर्ण करावी -खासदार भावनाताई गवळी

नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी यंत्रणांनी प्रलंबित कामे पुर्ण करावी -खासदार भावनाताई गवळी


जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभा


वाशिम : ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) वाशिम जिल्हयाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा. यासाठी यंत्रणांनी सर्वतोपरी प्रयत्न करुन लाभार्थ्यांना प्रत्येक योजनेचा लाभ देता येईल यासाठी प्रयत्न करावा. यंत्रणांना काही अडचण असल्यास जिल्हा प्रशासन व मला कळवावे. त्याचा पाठपुरावा शासन दरबारी करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. अशी ग्वाही खासदार भावनाताई गवळी यांनी दिली. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना मिळाल्याचे त्यांनी कळविले आहे.
          याबाबत अधिक वृत्त असे की, दि .5 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हा समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या आढावा बैठकीत श्रीमती भावनाताई गवळी बोलत होत्या.यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांची प्रमुख उपस्थिती होती. 
           श्रीमती भावनाताई गवळी पुढे म्हणाल्या, केंद्र सरकारच्या विविध योजना आहे. या योजनांचा लाभ जिल्हयातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना व्हावा. यासाठी विविध यंत्रणांनी परिश्रम घेऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.जेणेकरुन जिल्हयातील एकही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.सिंचनासाठी शेतात विहीर असणे आवश्यक आहे.जिल्हयात 10 हजार 286 विहीरीसाठी उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.त्यापैकी 8 हजार 230 विहीरींची कामे पुर्ण झाली आहे.2 हजार 56 विहीरींची कामे प्रगतीपथावर आहे.जिल्हयात मनरेगातून 53 हजार 217 कामे सुरु असून 36 हजार 240 कामे पुर्ण झाली आहे.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील 137 कामे सुरु असून त्यापैकी 120 कामे पुर्ण झालेली आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत 6 हजार 625 कामांचे उद्दिष्ट होते.त्यापैकी 4 हजार 149 कामे पुर्ण झाली असून 2 हजार 476 कामे प्रगतीपथावर आहे.जिल्हयात जलजीवन मिशन अंतर्गत 521 योजनेसाठी 559 गावांचा समावेश असून ही कामे तातडीने पुर्ण करावी. गुरांच्या गोठयासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ मंजूरी देवून लाभार्थ्यांना दिलासा दयावा.गुरांच्या गोठयासाठी पंचायत समितीत अर्ज सादर झाल्यावर त्यास तात्काळ मंजूरी प्रदान करावी.मनरेगा सन 2023-24 अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने मस्टर काढण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांना ट्रेनिंग देण्यात यावी.जेणेकरुन काम तातडीने पुर्ण होईल. जिल्हयातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे. त्याबाबत काही अडचण असल्यास कळवावे त्याची दखल घेवून शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल. असे निर्देशही त्यांनी यावेळी दिल्या.
          श्रीमती भावनाताई गवळी पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रुग्ण सेवेवर जास्त भर आहे.जिल्हयात हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची संख्या 16 आहे.त्यापैकी 5 दवाखाने वाशिम शहरात आहे.या दवाखान्यात डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन गरजू रुग्णांना चांगली सेवा दयावी. केंद्र व राज्य शासनाचे संपूर्ण लक्ष महिलांच्या सक्षमीकरणावर आहे. महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांचे संपूर्ण जिल्हयात प्रचार व प्रसिध्दी करावी.जिल्हयात भूजल सर्व्हेक्षणानुसार सर्व्हे करुन लाभार्थ्यांना विहीरीचा लाभ दयावा. तसेच मागेल त्याचा विहीर दयावी. जिल्हयातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन दयावे.एकबुर्जी प्रकल्पाच्या डावा व उजवा या दोनही कालव्याचे काम तातडीने करण्यात यावे.जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ वेळेत देण्यात यावा.सांडपाणी व घनकचराचे नियोजन करुन नाले सफाई करावी.आरोग्याच्या दृष्टीने फवारणी करावी.ग्रामसेवकांनी स्वत: लक्ष देवून ही कामे करावी.या कामात टाळाटाळ केल्यास ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येईल.असे श्रीमती भावनाताई गवळी यांनी यावेळी सांगीतले. 
           सभेत केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,कृषी विभाग,डिजीटल भारत भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना,राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान,एकात्मिक बाल विकास योजना,प्रधानमंत्री उज्वल योजना,प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण,उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व गौण खनिज विकास निधी योजनेचा आढावा यावेळी संबंधित यंत्रणांकडून श्रीमती भावनाताई गवळी यांनी घेतला. 
         माहितीचे सादरीकरण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांनी केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे,जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे,जिल्हा शल्कयचिकीत्सक डॉ.अनिल कावरखे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगांबर लोखंडे, शिक्षणाधिकारी राजेश शिंदे, शिक्षणाधिकारी (योजना) गजानन डाबेराव,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा,आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अंजिक्य वानखेडे,जिल्हा जलसंधारण अधिकारी एस.एस. फेरवाणी,लक्ष्मण मापारी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सतिश परभणकर,सर्व नगर परिषदचे मुख्याधिकारी,सर्व गटविकास अधिकारी यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व विविध यंत्रणेचे कार्यालय प्रमुख यांची उपस्थिती होती.  

वाशिम ते शिरपूर पर्यत अवघ्या २० किलोमिटर रस्त्यावर ४३ गतीरोधक
अपघाताची मालीका, वाहनधारकांचे कंबरडे मोडले; अनाधिकृत गतीरोधक काढण्याची मागणी


वाशिम - (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) रस्त्यावर गतीरोधक किती असावेत याची नियमावली असते. मुख्यत: रस्त्यावरील गावे आणि फाट्यावर भरधाव वाहनाने अपघात होवू नये म्हणून दोन्ही बाजुने गतीरोधक टाकलेले असतात. मात्र वाशिम ते शिरपूर या अवघ्या २० किलोमिटरच्या रस्त्यावर ५ नव्हे १० नव्हे तर तब्बल ४३ गतीरोधक आहेत. मर्यादेपक्षा जास्त असलेल्या या गतीरोधकामुळे वाहनधारकांची हाडे खिळखिळी होत असून २० किमीचे हे अंतर दुचाकीने पार करण्यासाठी तब्बल पाऊण ते एक ताख खर्ची घालावे लागत आहे. तसेच या गतीरोधकामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत असून वाहनधारकांचे कंबरडे मोडणारे हे अनाधिकृत गतीरोधक काढण्याची मागणी वाहन धारकांमधुन होत आहे.
 वाशिमपासून शिरपूरला जाण्यासाठी सोईचा आणि जलद मार्ग म्हणून नोकरदार, शिक्षक, कर्मचारी आदी नागरीक आपल्या दुचाकीने जाण्यासाठी या मार्गाचा जास्त उपयोग करत आहेत. या रस्त्यावर अनेक शाळा व गावे आहेत. शहरातील लाखाळा भागातून शिरपूरला जाणार्‍या या २० किलोमिटरच्या मार्गावर सोनखास, तामसी, ब्राम्हणवाडा, करंजी आदी गावे लागतात. २० किमीच्या या रस्त्यावर सोनखास ते तामसी हा ३ किमीचा रस्ता कच्चा असून उर्वरीत १७ किमीचा रस्ता हा डांबरी रस्ता आहे. या रस्त्यावर वाशिम ते सोनखासच्या पुलापर्यत एकूण १६ गतीरोधक आहेत. त्यानंतर तामसी ते ब्राम्हणवाडा पर्यत ८ गतीरोधक आहेत. तर ब्राम्हवाडा ते शेलगाव ओंकारगिर मंदिर पर्यत १३ गतीरोधक, एकट्या करंजी गावातच १० गतीरोधक असून मंदिर परिसरात ३ गतीरोधक आहेत. करंजी ते शिरपूरपर्यत ३ गतीरोधक आहेत. १७ किमीच्या या रस्त्यावर जवळपास ४३ गतीरोधक असून सोनखास ते तामसी हा ३ किमीचा डांबरी रस्ता बनल्यास या रस्त्यावर ४ ते ५ गतीरोधक निर्माण होवू शकतात. असे झाल्यास अवघ्या २० किमीच्या रस्त्यावर गतीरोधकाची संख्या ही ५० च्या घरात जावू शकते. रस्त्यालगत गावे, शाळा असल्यास संबंधीत विभाग या रस्त्यावर गतीरोधकाची निर्मिती करते. तसेच गतीरोधक कसे असावेत, त्याची उंची किती असावी याचेही मोजमाप व नियम आहेत. मात्र वाशिम ते शिरपूर या रस्त्यावर अपघात रोखण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त संख्येने टाकण्यात आलेल्या या गतीरोधकामुळे अपघात आहेत.
 गरज नसतांना या रस्त्यावर एवढ्या मोठ्या संख्येने गतीरोधक टाकल्यामुळे वाहनधारकांना अत्यंत कमी गतीने आपली वाहने चालवावी लागत आहेत. तर वाजवीपेक्षा जास्त गतीरोधकामुळे अनेक वाहनधारकांची हाडे खिळखिळी होत आहेत. वाहनधारकांचे कंबरडे मोडणारे हे अनाधिकृत गतीरोधक कमी करावे व गरज असेल तेथेच गतीरोधक ठेवावे अशी मागणी वाहन धारकांकडून पुढे येत आहे. असे वृत्त जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना कळविण्यात आले आहे .

जलसंपदाच्या पेपरफुटी प्रकरणी टी. सी. एस टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेस कंपनीची चौकशी करा



धागेदोरे महाराष्ट्रात असण्याची शक्यता : युवा सेनेचा आंदोलनाचा इशारा
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) - २७ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत टी. सी. एस टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेस या खाजगी कंपनीकडून स्थानिक गुलाटी टॉवरमध्ये जलसंपदा विभागाच्या परिक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणात एका महिला परिक्षार्थीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचे धागेदारे महाराष्ट्रात पसरलेले असण्याची शक्यता आहे. या बाबीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या प्रकरणी टी. सी. एस टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेस या खाजगी कंपनीची चौकशी करुन यातील मुख्य सुत्रधारांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. याप्रकरणी युवासेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांच्या नेतृत्वात व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, विरोधी पक्षनेते, पोलीस आयुक्त आदींना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
 


निवेदनात नमूद आहे की, येथील गुलाटी टॉवर येथे टी. सी. एस टाटा कंसल्टंशी सर्व्हिसेस या कंपनीकडून जलसंपदा विभागाचे परिक्षा पेपर घेण्यात आले होते. यादरम्यान२७ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या परिक्षेमध्ये अमरावती येथील विद्यार्थीनी कु. रश्मी सुरेशराव ठाकरे हिला पेपरमध्ये कॉपी करतांना पकडण्यात आले व तिच्यावर वाशिम येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र सदर युवतीकडे त्या दिवशीच्या पेपरची प्रत कोठून आली हा महत्वाचा प्रश्न आहे. वर्षभर विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करुन परिक्षेत चांगले गुण मिळावे म्हणून जिवापाड प्रयत्न करतात. मात्र या पेपरफुटी मुळे मेहनत करणार्‍या विद्यार्थ्याच्या मेहनतीवर पाणी फेरल्या जाते. व त्यांचे वर्ष वाया जाते. अत्यंत काटेकोर नियोजनात व सुरक्षेत खाजगी कंपनीकडून घेतल्या गेलेल्या परिक्षेत झालेल्या पेपर फुटी प्रकरणी सदर कंपनीच्या कर्मचार्‍यांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन यातील मुख्य सुत्रधारांवर कारवाई करणे गरजेचे आहे. खोलवर चौकशी केल्यास संपुर्ण अमरावती विभागात हा पेपर फुटीचा मोठा घोटाळा उघडकीस येवू शकते. सदर गैरप्रकार हा परिक्षेच्या खाजगीकरणामुळेच झाला आहे. यामुळे चांगल्या विद्यार्थ्याच्या भविष्याला धोका पोहचत असून असे पुन्हा होवू नये यासाठी सदर विद्यार्थीनीची सखोल चौकशी करुन याचा मास्टरमाईड व सुत्रधाराला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ठेंगडे यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देतांना अजय रणखांब, केदारनाथ रणखांब, दत्ता काळबांडे, रुपेश रणबावळे, नितीन अढाव, राजु गायकवाड, पुंजाजी खुनारे आदी उपस्थित होते. असे वृत्त त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना कळवीले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या