१२ वी चा निकाल ७ जुनला तर १० वी चा २० जुन पुर्वीच लागणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. इयत्ता दहावीचा निकाल बारावीच्या निकालानंतर १५ दिवसांनी जाहीर केला जाणा आहे. दोन्ही निकाल जून महिन्यातच जाहीर होणार आहेत.
राज्यातील बारावीच्या मुलांच्या निकालाची तयारी आता बोर्डाकडून अंतिम टप्प्यात आली आहे. ७ जूनला बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. पण, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. शिक्षणमंत्री स्वत: तारीख जाहीर करतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दहावीच्या मुलांची चित्रकलेची परीक्षा उशिरा झाल्याने त्यांचा निकाल २० जूनपर्यंत लागू शकतो, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली
कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा पार पडली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस नियोजन करून मुलांना वाढीव वेळ देण्यात आला होता. ‘गाव तेथे परीक्षा केंद्र’अंतर्गत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यात आली. कोरोनाच्या धास्तीत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे आता निकालाकडे लक्ष लागले आहे. सुरवातीला बारावीचा निकाल जाहीर केला जाणार असून सध्या तो पूर्ण झाला आहे. उत्तीर्ण मुलांना पुढील शिक्षणासाठी अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने ७ जूनला निकाल लावला जाणार आहे. तर दहावीचा निकाल थोडा विलंबाने जाहीर केला जाणार आहे. दहावीच्या मुलांना चित्रकलेचे तीन, पाच किंवा सात गुण दिले जातात. ते गुण त्या विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांमध्ये गणले जातात. या पार्श्वभूमीवर ६ जूनपर्यंत विभागीय मंडळांनी सर्व विद्यार्थ्यांचे गुण बोर्डाकडे पाठवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्या गुणांची गोळाबेरीज करून दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जाणार आहे. कोरोनाच्या संकटात देखील बारावीच्या १४ लाख तर दहावीतील १७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
0 टिप्पण्या