Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भात लखिमपुर खेरी शहीद अस्थिकलश यात्रेत अकोला भाकपा व किसान पुत्र सहभागी..!

विदर्भात लखिमपुर खेरी शहीद अस्थिकलश यात्रेत अकोला भाकपा व किसान पुत्र सहभागी..!


प्रतीनीधी, अकोला-
विदर्भात लखिमपुरखेरी शहीद किसान पत्रकार अस्थिकलश यात्रा भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र सचिव व किसान सभेचे नेते कॉम्रेड तुकाराम भस्में, कॉम्रेड अरुण वनकर, कॉम्रेड अशोक सोनारकर अकोला भारतीय कम्युनिस्ट पक्ष सचिव व किसान नेते कॉम्रेड नयन गायकवाड़ यांच्या नेतृत्वात निघालेली ही यात्रा उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. अजय मिश्र टेनी यांच्या गुंडांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारा पेक्षा अधिक शेतकऱ्यांना भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात येऊन ते गंभीर जखमी झाले. शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत काळीकुट्ट व निषेधार्ह घटना आहे.संयुक्त किसान मोर्चाचे उत्तराखंडचे एक नेते तेजिंदर सिंग विर्क हे ही एक लक्ष्य होते पण ते वाचले. हे हत्याकांड इतके क्रूर होते कि तिथे असलेला जनसमुदाय क्रुद्ध झाला व ३ भाजपचे गुंड देखील मृत्यू पावले. पण ही प्रतिक्रिया अपवादात्मक आहे आणि शांततामय आंदोलन हाच शेतकरी आंदोलनाचा स्थायीभाव राहिला आहे हे अधोरेखित केले पाहिजे. 


संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन कृषी कायदे रद्द करा, किफायतशीर आधारभावाची हमी देणारा केंद्रीय कायदा करा ,शेती कचरा जाळण्याच्या संबंधातला कायदा  रद्द करा व शेतकरी व सामान्य ग्राहकांना उद्ध्वस्त करणारे वीज विधेयक मागे घ्या या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत गेल्या ११ महिन्यापेक्षा अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. अजय मिश्र टेनी यांनी “आम्हाला संधी मिळू द्या मग शेतकऱ्यांना कसे सरळ करतो पहा” असे धमकी देणारे वक्तव्य केले होते. शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून ही धमकी त्यांनी क्रूरपणे खरी करून दाखवली आहे. 


उत्तर प्रदेशमधील ही घटना प्रातिनिधिक आहे. ११ महिन्यापूर्वी जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू झाले तेव्हा पासून तीन जुलमी कायदे अंमलात आणण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने व केंद्र व राज्यातील त्यांच्या सरकारांनी नेहमीच उघडपणे हिंसेचा व क्रौर्याचा मार्ग स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनही या घटनेचा साधा निषेधही केलेला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळातून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांची हकालपट्टी केलेली नाही. त्यांना ३०२ च्या गुन्ह्याखाली अटक झालेली नाही. उलट भाजपचे एक नेते व हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. मनोहर लाल खट्टर यांनी उत्तर प्रदेशची घटना ताजी असतानाच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चोपून काढण्यासाठी हजार हजार भाजप कार्यकर्त्यांनी हातात काठ्या घ्याव्यात, प्रसंगी जेलमध्ये जायची तयारी ठेवून शेतकऱ्यांना बदडून काढावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी खट्टर यांचा मतदारसंघ असलेल्या कर्नालमध्ये उपविभागीय अधिकारी आयुष सिन्हा यांनी शेतकऱ्यांची सरळ डोकी फोडा असे आदेश पोलिसांना दिले होते. 


यापूर्वी प्रजासत्ताक दिनी संयुक्त किसान मोर्चाने आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या भव्य ट्रॅक्टर रॅलीला भाजपने त्यांच्या हस्तक असलेल्या दीप सिद्धूला हाताशी धरून आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा, लाल किल्ल्यावर हल्ला केल्याच्या बनावट बातम्या प्रसारित करून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनाला सुरुवात झाली तेंव्हा शांततापूर्वक दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारण्यात आले. अश्रूधूर सोडण्यात आला,रस्त्यांमध्ये सिमेंट कॉक्रीट भिंती उभारण्यात आल्या. खिळे ठोकण्यात आले. शेतकऱ्यांना थंडी, ऊन, पाऊस, वाऱ्यात मरण्यासाठी सोडून देण्यात आले. सरकारच्या या क्रूर वागणुकीमुळे आजवर आंदोलनात ६३१ शेतकरी शहीद झाले आहेत. त्यात सीताबाई रामदास तडवी  या अक्कलकुवा तालुक्यातील महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी महिलेचा समावेश आहे. जे.एन.यु.मधील विद्यार्थी आंदोलन असो की एन.आर. सी. विरोधी शाहीन बाग आंदोलन असो, भाजपने नेहमीच जनतेच्या विरुद्ध हिंसेचा वापर केला आहे.  नुकतीच सिंघू सीमेवर एका दलित शेतकऱ्याची निहंग शिखांच्या अनुयायांकरवी हत्या करण्यात आली. संयुक्त किसान मोर्चाने या हत्येचा तीव्र निषेध केला आहे.शेतकरी आंदोलन संपवण्यासाठी निहंग प्रमुखाला कृषी मंत्री भेटले होते व त्यांना भाजपकडून पैसे देऊ केले गेले होते अशा बातम्या आल्या आहेत.समोर येणाऱ्या पुराव्याच्या पार्श्वभूमीवर या हत्येची चौकशी झाली पाहिजे अशी  मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.  


लखीमपुर खेरी हत्याकांडाने जिवंत माणसांना चिरडून हिंस्रतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. उत्तरेतील निर्धारपूर्वक शेतकरी आंदोलनाने भाजपाची अमानुष मानसिकता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. फॅसिस्ट अमानुषता महाराष्ट्राला नवी नाही. मनुवादी फॅसिस्टांनी पाठवलेल्या मोटारसायकल स्वारांनी कॉ. गोविंद पानसरे यांचा खून केला. त्याआधीही डॉ . दाभोलकरांचा खुनही याच पद्धतीने त्यांनी घडवला. त्यांच्या हत्येच्या प्रकरणी न्याय होणे कित्येक वर्षे लोटली तरी अजूनही बाकी आहे. उत्तरेतील वर उल्लेखलेल्या घटनांच्या मालिकेनंतर या हिंसक प्रवृत्तींनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. लखीमपूर खिरीनंतर लगेचच, महात्मा फुले व मार्क्स यांच्या विचाराने प्रेरित होवुन दिल्ली शेतकरी आन्दोलनाची ज्योत महाराष्टभर घेउन जाणाऱ्या कॉ सुभाष काकुस्ते यांच्यावर चेहरा झाकलेल्या मोटार सायकल स्वारानी हल्ला केला. मोदी यांच्यावर टीका कराल तर खलास करु अशी धमकी देऊन त्याना धक्काबुक्की करुन खाली पाडले व  त्यांचे सत्यशोधक शेतकरी आदिवासी चळवळीतील साथी किशोर ढमाले यांचा ठावठिकाणा विचारत , त्यांच्याकडेही बघून घेऊ असे हल्लेखोर बोलत होते. दाभोलकर पानसरे ते काकुस्तेनपर्यंतच्या सर्व घटनांमधील साम्य स्थळे महाराष्ट्रातील कामगार शेतकरी जनचळवळीतील कार्यकर्ते, समतावादी, विज्ञानवादी, पुरोगामी व राज्य घटनेवर विश्वास ठेवणारे जनसमुदाय नक्कीच लक्षात घेतील व या किंवा अशाच हल्याबाबत निर्धारपूर्वक प्रत्यूत्तर दिले जाईल.या हल्ल्यातील हल्लेखोर व त्यामागील सूत्रधार यांना ताबतोब अटक झाली पाहिजे अशी मागणी करीत आहोत.
संयुक्त किसान मोर्चाने पार्श्वभूमीवर लखीमपूर खेरी सहित आंदोलनातील सर्व ६३१ शहीद शेतकऱ्यांना देशभर आदरांजली अर्पित करण्यासाठी, ज्या कारणासाठी या शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या लढाईला आणखी व्यापक, निर्णायक व आशयघन करण्यासाठी आणि भाजपच्या हिंस्र कृत्यांचा व सर्व प्रकारच्या हिंसेचा धिक्कार करण्यासाठी देशभर शहीद अस्थिकलश यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या चळवळीचे ऊर्जास्थान असलेल्या पुण्यातील महात्मा जोतीराव फुले यांच्या वाड्यातून या शहीद अस्थिकलश यात्रांना दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरुवात होत आहे. विविध संघटनांच्या माध्यमातून राज्यभर मिरवणुका व सभा घेत, राज्यातील विदर्भातील जनचळवळींच्या विविध शक्तिस्थानांना भेटी देत नंतर कलशांमधील शहिदांच्या अस्थी महाराष्ट्र‌ाच्या विदर्भाच्या मातीत विलीन करण्यात येणार आहेत.   


आपल्या मागण्यांसाठी शांतता व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिंता व आक्षेप समजावून न घेता किंबहुना त्याकडे दुर्लक्ष्य करून सत्ताधारी पक्षाच्या व वर्गाच्या आर्थिक व राजकीय हितसंबंध सामावलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठीच सरकारचा हा दुराग्रह सुरू आहे. कॉर्पोरेट कंपन्यांना शेती क्षेत्रात नफा कमावण्याची अमाप संधी दिसते आहे. शेतीमालाचे उत्पादन, खरेदी, वाहतूक, साठवणूक, प्रक्रिया, आयात, निर्यात व विक्री या संपूर्ण क्षेत्रात आपल्या तुंबड्या भरण्यासाठी या कंपन्यांनी सुनियोजित आखणी केली आहे.  नफा कमविण्यासाठी ‘भुके’चा ‘शाश्वत’ वापर करता येतो हे या कंपन्यांना माहीत आहे. जगभरच्या आपल्या भागीदार कंपन्यांनी  तेथील शेतीमाल व अन्नावर कब्जा मिळवून विविध कृषिप्रधान देशांना कसे 'भुकेकंगाल' केले व स्वत: कशा ‘मालामाल’ झाल्या हे त्यांनी पाहिले आहे. भारतात असेच करण्यासाठी या कंपन्यांना भारतातील अन्न व शेतीमालाच्या साठ्यावर ‘निर्णायक मक्तेदारी’ हवी आहे. अदानी व अंबानीच्या कॉर्पोरेट कंपन्यांनी यासाठी अत्याधुनिक सायलोच्या रूपात अजस्र गोदामे उभी केली आहेत. देशभरातील हे सायलो रेल्वे रुळांच्या माध्यमातून मुख्य लोहमार्गांना जोडण्यात आले आहेत. कृषी कायदे हे सायलो भरण्यासाठीच आणण्यात आले आहेत. सायलोच्या या विस्तृत साखळीच्या माध्यमातून अन्नधान्याचा अमर्याद साठा या कंपन्यांच्या हाती आल्यास या कंपन्यांना शेतीमालाचे खरेदी भाव पाहिजे तसे पाडता येतीलच शिवाय अन्न धान्य व अन्न पदार्थांच्या विक्री किंमतीही वाट्टेल तशा वाढविता येतील. यातून अन्न सुरक्षा व रेशन व्यवस्था संपवून एक प्रकारची ‘अन्न गुलामगिरी’ व ‘अन्न हुकूमशाही’ भारतीय जनतेवर लादली जाईल.हे मनसुबे उधळून लावण्याकरिता या यात्रेतून जनतेचे प्रबोधनही होणार आहे. 


महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारातील तिन्ही पक्षांनी नुकताच लखीमपूर हत्याकांडाविरोधी राज्यव्यापी बंद पाळला होता. आपल्या सर्व संघटनांनी त्याला पाठिंबा दिला होता. या यात्रेच्या निमित्ताने मविआ सरकारने मोदी सरकारच्या वादग्रस्त कायद्यात वरवर बदल करीत मांडलेली तीन कृषी विधेयके मागे घेऊन , केंद्राच्या तीन कायद्यांना संपूर्ण विरोधाचा ठराव दोन्ही सभागृहात संमत करून , किमान हमी भावाचा कायदा शेतकरी संघटनाबरोबर चर्चेअंती निश्चित  करून तसेच फडणवीस सरकारने जमीन अधिग्रहण कायद्यात केलेले सर्व बदल मागे घेऊन व २०१३ चा कायदा पुनर्स्थापित करून आपली आदरांजली वाहावी असे आवाहनही आम्ही करत आहोत. ही यात्रा अमरावती मधुन निघुन अकोला मार्गे नागपुरला १८ तारखेला समारोप होईल सदर सभेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते व किसान सभेचे राष्ट्रिय अध्यक्ष कॉम्रेड अतुल अंजान व अकोला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड रमेश गायकवाड सहभागी मार्गदर्शन करतील आज पासुन विदर्भात निघालेल्या यात्रेत कॉम्रेड नयन गायकवाड, कॉम्रेड विद्याधर ढोरे, कॉ. संतोष वावळ, कॉ. स्वाती गायकवाड सह अकोला, अमरावती, बुलढाणासह शेकडो शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, विद्यार्थी, युवक, असंघटित कामगार, वंचित घटक, संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, महाराष्ट्र, जन आंदोलनांची संघर्ष समिती, महाराष्ट्र, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, महाराष्ट्र, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र, असंघटित कामगारांची संयुक्त कृती समिती , महाराष्ट्र सजग नागरिक या सर्वांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील शेकडो संघटनांना सोबत घेत हा जागर सुरू आहे.


आपणही या जागरात सहभागी व्हा !
शेतकरी शहिदांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्यासाठी आंदोलनात  सहभागी व्हा ! सढळ हाताने अन्नधान्याने मदत करा..!

इन्कलाब जिंदाबाद !
संयुक्त किसान मोर्चा

अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या